पुणे : संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांनी ‘लिहिलेल्या’ कवितांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. या कवितासंग्रहातील कविता तर वैशिष्ट्यपूर्णच आहेतच; पण संग्रहाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण हस्तलिखित स्वरूपात असलेले आधुनिक काळातील हे पहिले पुस्तक ठरणार आहे. पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे ते पुस्तक प्रकाशित होत आहे.
पूर्वीच्या काळी हस्तलिखितांनाच महत्त्व होते. नंतरच्या काळात छपाईचे तंत्र विकसित झाल्यावर हळूहळू हस्तलिखित पुस्तक हा प्रकार मागे पडला. मिलिंद जोशी यांच्या कवितासंग्रहाच्या निमित्ताने हस्तलिखिताची कल्पना आधुनिक काळातील पुस्तकासाठी वापरली जात आहे. मिलिंद जोशी यांनी स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या कवितांचे स्कॅनिंग करून ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह साकारला आहे. त्यामुळे कवीच्याच हस्ताक्षरातील कविता वाचकांना वाचता येणार असून, अक्षरांचे सौंदर्य आणि त्या अक्षरांतून तयार झालेल्या शब्दांचे अर्थसौंदर्य अशा दोन्हींचा आनंद वाचकांना लुटता येणार आहे. पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे हे पुस्तक साकार झाले असून, लवकरच प्रकाशन सोहळ्याची तारीख जाहीर केली जाणार आहे. ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपातही हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
मिलिंद जोशी यांनी अश्रूंची झाली फुले, ठष्ट, टॉम अँड जेरी, गेट वेल सून अशा अनेक मराठी नाटकांसाठी, तसेच अनेक हिंदी नाटके, बिनधास्त, शेंटिमेंटल असे अनेक चित्रपट, अल्बम्स, टीव्ही मालिका, फुल डोम शोज आणि जर्मन मल्टिव्हिजन शोज यांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. गेली अनेक वर्षे ते वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून काव्यगायन करत असून, मुशायऱ्यांमध्ये कवी म्हणून सहभाग घेतात. झी मराठीवरील ‘सारेगमप,’ कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ यांसारख्या अनेक म्युझिक रिअॅलिटी शोजमध्येही परीक्षक, स्पर्धक निवड परीक्षक, गायन मार्गदर्शक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी योगदान दिले आहे.
चित्रपट, नाटकांच्या सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना पुरस्कार मिळाले असून, सर्वोत्कृष्ट नेपथ्यासाठीही पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा आगामी कवितासंग्रहातून त्यांच्या कलेचा वेगळा आविष्कार रसिकांना पाहायला मिळणार आहे.
(कवितासंग्रहाची एक झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)